नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : एम.एम. महाविद्यालय, पाचोरा येथे कार्यरत संशोधक पौर्णिमा मोहित ठोके-देशमुख यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी राज्यशास्त्र विषयातील “स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी” या समकालीन आणि महत्त्वपूर्ण विषयावरील संशोधनासाठी विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी जाहीर केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या मौखिक परीक्षेनंतर विद्यापीठाने त्यांच्या संशोधनास मान्यता दिली असून, विषयतज्ज्ञांनी या संशोधनाला उच्च दर्जाचे, अभ्यासपूर्ण आणि भविष्यातील धोरणात्मक निर्णयांसाठी दिशादर्शक ठरणारे संशोधन म्हणून गौरविले आहे.
हे संशोधन त्यांनी सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. प्रमोद मनोहर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. संशोधनात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचा केवळ राजकीय दृष्टिकोनातून नव्हे, तर ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय आणि प्रादेशिक विकासाच्या दृष्टीने सर्वंकष अभ्यास करण्यात आला आहे. संशोधनाचा उद्देश महाराष्ट्राचे विभाजन सुचविणे नसून, स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती झाल्यास त्या प्रदेशाच्या विकासाला कोणत्या प्रकारे चालना मिळू शकते, याचे वस्तुनिष्ठ आणि शास्त्रीय विश्लेषण करणे हा असल्याचे संशोधनातून स्पष्ट करण्यात आले आहे.
या संशोधनामध्ये विदर्भाच्या स्वतंत्र राज्याच्या मागणीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, नागपूर करार, महाराष्ट्र राज्याची निर्मिती, प्रादेशिक असमतोल, प्रशासनातील विकेंद्रीकरण, नैसर्गिक संसाधनांचा प्रभावी वापर, लोकसंख्या, औद्योगिक विकास, शेती, रोजगार, शिक्षण, सार्वजनिक धोरणे तसेच विविध राजकीय पक्षांची भूमिका यांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. याशिवाय विदर्भातील जनमत, स्थानिक अपेक्षा आणि भविष्यातील विकासाच्या शक्यतांचाही अभ्यास संशोधनात समाविष्ट करण्यात आला आहे.
संशोधनासाठी वर्णनात्मक, ऐतिहासिक आणि सर्वेक्षणात्मक संशोधन पद्धतींचा अवलंब करण्यात आला. प्राथमिक व दुय्यम स्रोत, प्रश्नावली, मुलाखती, संदर्भग्रंथ, संशोधन निबंध तसेच विविध अधिकृत दस्तऐवजांचा प्रभावी वापर करण्यात आल्याने संशोधन अधिक विश्वासार्ह, वस्तुनिष्ठ आणि शास्त्रीय पद्धतीने साकारले गेल्याचे परीक्षकांनी नमूद केले आहे.
परीक्षकांच्या मते, झारखंड, छत्तीसगड, उत्तराखंड आणि तेलंगणा या राज्यांच्या निर्मितीनंतर देशात स्वतंत्र राज्यांच्या मागण्यांना नव्याने बळ मिळाले असून, त्या पार्श्वभूमीवर विदर्भाच्या मागणीचा हा अभ्यास अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. विकास, प्रादेशिक समतोल आणि प्रशासकीय कार्यक्षमतेच्या दृष्टीने या विषयाचा सखोल विचार करण्यात आला असून, हे संशोधन भविष्यातील संशोधक, अभ्यासक आणि धोरणकर्त्यांसाठी उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी नमूद केले आहे.
मौखिक परीक्षेसाठी प्रा. डॉ. वकील शेख (नागपूर) यांनी वरिष्ठ परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनी संशोधनाची गुणवत्ता, विषयाची निवड, शास्त्रीय मांडणी, निष्कर्षांची वस्तुनिष्ठता आणि सामाजिक उपयुक्ततेचे विशेष कौतुक केले. हा संशोधनप्रबंध राज्यशास्त्र विषयातील मोलाचे योगदान असून, भविष्यात या विषयावर स्वतंत्र पुस्तक प्रकाशित व्हावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते पौर्णिमा मोहित ठोके-देशमुख यांना पीएच.डी. पदवीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे आणि कुलसचिव डॉ. विनोद पाटील उपस्थित होते.
या यशाबद्दल एम.एम. महाविद्यालय, पाचोरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय वाघ, संचालक व्ही. टी. (नाना) जोशी, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारीवृंद तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या संशोधन परंपरेत आणखी एका मानाच्या पर्वाची नोंद झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
विदर्भाच्या विकासासंदर्भातील चर्चेला शास्त्रीय अधिष्ठान देणारे हे संशोधन राज्य पुनर्रचना, प्रादेशिक विकास, प्रशासनातील विकेंद्रीकरण आणि सार्वजनिक धोरणांचा अभ्यास करणाऱ्या संशोधक, विद्यार्थी आणि धोरणकर्त्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक व संदर्भग्रंथ ठरेल, असा विश्वास शिक्षण क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.





