नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : वडिलोपार्जित घराच्या उताऱ्यावर वडिलांचे नाव पुन्हा नोंदवून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ अटक केली. जितेंद्र प्रकाश पाटील (वय ४५, रा. भूषण कॉलनी, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे एसीबी कार्यालय आणि भूमी अभिलेख कार्यालय अवघ्या १०० फुटांच्या अंतरावर असल्याने ही कारवाई अत्यंत गुप्त पद्धतीने पार पाडावी लागली.
गेल्या चार दिवसांपासून एसीबीचे पथक आरोपीवर नजर ठेवून होते. मात्र दोन्ही कार्यालयांतील कर्मचारी एकमेकांना ओळखत असल्याने सापळा यशस्वी होत नव्हता. अखेर बुधवारी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी वेषांतराचा मार्ग स्वीकारला. कुणी सामान्य नागरिक बनून परिसरात फिरत होते, कुणी दुचाकी बंद पडल्याचे नाटक करत होते, तर काही कर्मचारी शेंगदाणे स्टॉलजवळ उभे राहून हालचालींवर लक्ष ठेवून होते.
पूर्वनियोजनानुसार तक्रारदाराने भूकरमापक जितेंद्र पाटील याला १५ हजार रुपयांची लाच दिली. लाच स्वीकारल्यानंतर तक्रारदाराने चेहऱ्याचा घाम पुसण्यासाठी खिशातून रुमाल काढला. हा पूर्वनियोजित संकेत मिळताच परिसरात दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपीला पंचांसमक्ष लाचेच्या रकमेसह पकडले.
तक्रारदाराचे जळगाव शहरात वडिलोपार्जित घर असून, त्या मालमत्तेच्या नोंदीत फेरफार करून त्यांच्या काकांनी स्वतःचे नाव लावले होते. याविरोधात तक्रारदाराने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात अपील दाखल केले होते. सुनावणीनंतर संबंधित फेरफार रद्द करून तक्रारदाराच्या वडिलांचे नाव पुन्हा उताऱ्यावर नोंदवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आदेशानंतरही प्रत्यक्ष नोंद दुरुस्त होत नसल्याने तक्रारदाराने वारंवार पाठपुरावा केला.
दरम्यान, भूकरमापक जितेंद्र पाटील यांनी हे काम करून देण्यासाठी “साहेबांना पैसे द्यावे लागतील” असे सांगत लाचेची मागणी केली होती. यानंतर तक्रारदाराने २५ जून रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. पडताळणीदरम्यान १५ हजार रुपयांची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एसीबीने सापळा रचत ही कारवाई केली.
या कारवाईत पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलिस निरीक्षक रेश्मा अवतारे, हेमंत नागरे, सुरेश पाटील, संगीता पवार, राकेश दुसाने, प्रदीप पोळ आणि मनोज पाटील यांनी सहभाग घेतला. आरोपीविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.





