नवराज्यLive न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव महापालिकेतील शिवाजीनगर परिसरातील भूसंपादन प्रकरण आता थेट राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात पोहोचले असून, या प्रकरणामुळे महापालिकेतील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आमदार सुरेश भोळे यांनी बुधवारी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करत भूसंपादन प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला. या संपूर्ण व्यवहारात महापालिकेचे काही अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी सरकारकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली.
भूसंपादन प्रकरण आता थेट राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात पोहोचले असून, या प्रकरणामुळे महापालिकेतील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आमदार सुरेश भोळे यांनी बुधवारी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करत भूसंपादन प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला. या संपूर्ण व्यवहारात महापालिकेचे काही अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी सरकारकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली.
शिवाजीनगर परिसरातील योजना तसेच शाळा आणि घरकुल रस्त्यासाठी महापालिकेकडून दोन स्वतंत्र जागांचे भूसंपादन करण्यात आले होते. संबंधित जागांचा मोबदला अदा झाल्यानंतर वाढीव भरपाईसाठी न्यायालयात दावे दाखल करण्यात आले. मात्र, या प्रकरणात महापालिकेकडून न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडण्यात अपयश आल्याचा आरोप करण्यात येत आहे. परिणामी, महापालिकेवर तब्बल १५० कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडल्याचे समोर आले आहे.
अधिवेशनात बोलताना आमदार भोळे यांनी महापालिकेची आर्थिक परिस्थिती आधीच डळमळीत असताना चुकीच्या मूल्यांकनामुळे आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या पैशांचा मोठा फटका बसल्याचे सांगितले. या व्यवहारामागे संगनमताचा संशय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत तक्रार केल्याचे सांगत सरकारने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
या वक्तव्यामुळे जळगाव महापालिकेतील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आमदार भोळे यांनी कोणत्याही पदाधिकाऱ्याचे नाव जाहीरपणे घेतले नसले तरी त्यांच्या सूचक आरोपांमुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणातही चर्चांना उधाण आले आहे. महापालिकेतील ‘भूखंडाचे श्रीखंड’ पुन्हा एकदा राज्यपातळीवर चर्चेचा विषय ठरले आहे.






