नवराज्य Live न्यूज नेटवर्क
देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया असलेल्या स्पर्धा परीक्षांची विश्वासार्हता आज गंभीर संकटात सापडली आहे. NEET-UG २०२६ परीक्षेतील गैरप्रकार, परीक्षा रद्द करणे आणि पुनर्परीक्षा घेण्याची वेळ आल्यानंतर आता शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीच्या आरोपांनी राज्यातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड संताप व अस्वस्थता निर्माण केली आहे.
NEET-UG २०२६ परीक्षेसाठी देशभरातील सुमारे २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेतले. अनेक कुटुंबांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च केले, कर्ज काढले, आयुष्यभराची बचत खर्च केली. मात्र पेपरफुटीच्या संशयामुळे परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षा घेण्याची वेळ येणे, ही केवळ प्रशासकीय चूक नसून संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे.
विशेष म्हणजे २०२४ मधील NEET वादानंतर परीक्षा प्रक्रियेत आवश्यक सुधारणा केल्या जातील, अशी अपेक्षा देशभरातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतरही २०२६ मध्ये पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण होणे हे सुरक्षा व्यवस्थेचे, प्रशासनाचे, पारदर्शकतेचे आणि उत्तरदायित्वाचे अपयश अधोरेखित करते.
याच पार्श्वभूमीवर राज्यातील TET परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणारे ग्रामीण, मध्यमवर्गीय व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेत असतात. अशा विद्यार्थ्यांच्या परिश्रमावर पाणी फेरणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना काँग्रेस पक्ष कदापि सहन करणार नाही.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही शासनाकडे पुढील मागण्या करीत आहोत –
• TET पेपरफुटी प्रकरणाची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.
• दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी आणि त्यामागील संपूर्ण साखळी जनतेसमोर आणण्यात यावी.
• राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्याधुनिक, तंत्रज्ञानाधारित, पारदर्शक व सुरक्षित यंत्रणा उभारण्यात यावी.
• परीक्षा रद्द होणे अथवा पुनर्परीक्षा घेण्यामुळे विद्यार्थ्यांवर होणाऱ्या मानसिक व आर्थिक परिणामांचा अभ्यास करून आवश्यक सहाय्य व्यवस्था निर्माण करण्यात यावी.
• परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या कार्यपद्धतीचे नियमित स्वतंत्र लेखापरीक्षण करण्यात यावे.
एक विद्यार्थी दोन-दोन वर्षे अभ्यास करतो, पालक कष्टाची कमाई खर्च करतात, अनेक माता दागिने विकतात, वडील कर्ज घेतात आणि संपूर्ण कुटुंब आपल्या मुलांच्या यशाची स्वप्ने पाहते. मात्र एका पेपरफुटीमुळे अथवा प्रशासकीय निष्काळजीपणामुळे त्या कुटुंबाचे संपूर्ण स्वप्न उद्ध्वस्त होणे ही अत्यंत वेदनादायी बाब आहे.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे, परिश्रमाचे आणि समान संधीच्या तत्त्वाचे रक्षण करणे ही शासनाची घटनात्मक जबाबदारी आहे. स्पर्धा परीक्षांमधील पारदर्शकता, विश्वासार्हता आणि गुणवत्तेचे संरक्षण करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सातत्याने विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहील.
या पत्रकार परिषदेस जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री. जामील शेख, श्री. मनोज वाणि, श्री. कफ़ील अहमद, युवक काँग्रेसचे सदस्य श्री. अनंत पाटील, मुक्ताईनगर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष श्री. चेतन झांके तसेच एनएसयूआयचे श्री. विवेक सपकाळे उपस्थित होते.
– धनंजय शिरीष चौधरी
जिल्हाध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
जळगाव पूर्व जिल्हा (रावेर लोकसभा क्षेत्र)





