पाळधी / धरणगाव / जळगाव प्रतिनिधी, दि. ३० मे – “माणसातला देव माणूस म्हणजे आदरणीय गुलाबराव पाटील. समाजसेवा, धर्मकार्य आणि वारकरी संप्रदायाच्या उन्नतीसाठी त्यांनी आयुष्यभर केलेले कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी आहे. समाजहितासाठी केलेल्या सेवाकार्याचा वारसा पुढील पिढीने जपणे हीच खरी संतसेवा आहे,” असे प्रतिपादन साध्वी सोनाली दीदी करपे यांनी केले.*
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त पाळधी येथे आयोजित भव्य राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात चौथ्या दिवसाची कीर्तनसेवा साध्वी सोनाली दीदी करपे यांनी अत्यंत प्रभावी, ओजस्वी आणि भावस्पर्शी शब्दांत संपन्न केली. त्यांच्या कीर्तनासाठी हजारो भाविक, वारकरी आणि कीर्तनप्रेमींनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला.
संस्कारांचा वारसा जपण्याचा संदेश

“माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा” या अभंगातील ओळींचा संदर्भ देत त्यांनी अत्यंत हृदयस्पर्शी विचार मांडले. वडिलोपार्जित संपत्तीसोबतच वडिलांनी दिलेले संस्कार, समाजसेवा आणि चांगल्या कार्याचा वारसाही पुढे नेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
विशेषतः युवतींना मार्गदर्शन करताना धर्म, संस्कार आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेप्रती निष्ठावान राहण्याचे आवाहन त्यांनी केले. क्षणिक आकर्षण, चुकीचे निर्णय आणि दिशाभूल करणाऱ्या प्रवृत्तींपासून दूर राहून जीवनातील प्रत्येक निर्णय विवेकाने घ्यावा, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्याचा गौरव
समाजसेवा, धर्मकार्य आणि वारकरी संप्रदायाच्या वृद्धीसाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या कार्याची परंपरा त्यांच्या सुपुत्रांमध्येही रुजली आहे. प्रतापराव पाटील व विक्रम (विकी बाबा) पाटील हे समाजसेवेचा हा वारसा समर्पित भावनेने पुढे नेत असून, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने समाजहितासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
साध्वी सोनाली दीदी करपे यांच्या अभ्यासपूर्ण, ओजस्वी आणि समाजप्रबोधनपर कीर्तनाने उपस्थित भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. संतविचार, संस्कार आणि समाजसेवेचा संदेश त्यांनी प्रभावीपणे मांडत उपस्थितांच्या मनावर ठसा उमटविला.
यांची होती विशेष उपस्थिती
या भव्य कीर्तन सोहळ्यासाठी श्री ह.भ.प. गौप्रेमी गजाननजी महाराज वरसाडेकर, यज्ञेश महाराज माळी, कैलास महाराज पवार, मयूर महाराज दरेकर, परमेश्वर महाराज पारधीकर, निंबा महाराज वाघडूतकर, अनिल महाराज एकलग्नकर, गोपाल महाराज दापूरेकर यांच्यासह वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर महाराज मंडळी उपस्थित होती.
हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीचा महासागर
जीपीएस ग्रुप तसेच युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आणि विक्रम (विकी बाबा) पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाला दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भव्य मंडप, आकर्षक व्यासपीठ, उत्कृष्ट ध्वनी व्यवस्था आणि सुयोग्य नियोजनामुळे संपूर्ण परिसर भक्ती, अध्यात्म आणि संतविचारांच्या वातावरणाने भारावून गेला आहे.
टाळ-मृदंगाच्या निनादात, विठ्ठलनामाच्या अखंड गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात चौथ्या दिवसाचा कार्यक्रम जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. हजारो भाविकांनी कीर्तनाचा लाभ घेत भक्तिरसाचा आनंद लुटला. राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवामुळे संपूर्ण पंचक्रोशीत भक्ती, अध्यात्म आणि संतविचारांचा जागर निर्माण झाला असून हरिनामाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला आहे.







