नवराज्य Live न्यूज नेटवर्क
कजगाव : कजगाव येथील आरटीई प्रवेश प्रक्रियेसंदर्भात करण्यात आलेल्या तक्रारीची अखेर जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाने दखल घेतली असून संबंधित प्रकरणात आवश्यक चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे पालकांसह शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
कजगाव परिसरात आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला होता. काही विद्यार्थ्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील असल्याचे दाखवण्यासाठी कथित खोटे उत्पन्न दाखले सादर करून प्रवेश मिळवल्याची तक्रार करण्यात आली होती.
तसेच प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता.
या संदर्भात तक्रारदारांनी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. यामध्ये संबंधित शाळांचे प्रवेश अभिलेख, उत्पन्न दाखले, कागदपत्रांची पडताळणी तसेच प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्याची मागणी करण्यात आली होती.
तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाने संबंधित विभागाला आवश्यक माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्याची माहिती मिळत आहे. तसेच दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेतील पारदर्शकता व पडताळणी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून सर्वसामान्य व पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. अनेक पालकांनी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
आरटीई अंतर्गत शिक्षणाचा हक्क हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आधार मानला जातो. त्यामुळे अशा योजनांमध्ये गैरप्रकार होत असल्यास संबंधित प्रशासनाने तत्काळ व कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.







