नवराज्य Live न्यूज नेटवर्क
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला असून, उमेदवारी अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाल्याची माहिती समोर आली आहे. विविध इच्छुकांकडून एकूण २५ अर्जांची खरेदी करण्यात आल्याने निवडणुकीची उत्सुकता आणखी वाढली आहे.
मात्र, अर्ज खरेदी करणाऱ्या इच्छुकांची नावे जाहीर करण्यात प्रशासनाने टाळाटाळ केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता अपेक्षित असताना प्रशासनाने अधिकृत माहिती देण्याबाबत सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले.
दरम्यान, मोठ्या प्रमाणात अर्ज विक्री झाल्यामुळे विविध पक्षांमध्ये अंतर्गत हालचाली वाढल्या असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही संभाव्य इच्छुक आणि राजकीय समीकरणांमुळे प्रशासनाने संयमित भूमिका घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील या घडामोडींमुळे विधान परिषद निवडणुकीत यंदा मोठी राजकीय चुरस पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.





