नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून, शिवसेना आता ही निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सोमवारी सायंकाळी जळगावातील एका खास बैठकीत शिवसेनेच्या आमदारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत, “जागा द्या… अन्यथा आम्हाला लढू द्या,” अशी स्पष्ट भूमिका मांडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महायुतीच्या जागावाटपात जळगावची जागा अद्याप निश्चित न झाल्याने शिवसेनेत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील प्रमुख आमदार व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना विधान परिषद निवडणूक लढवण्यास पूर्णपणे तयार असल्याचे एकमताने ठरवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
बैठकीनंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख विलास लांडे, आमदार किशोर पाटील, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीची सविस्तर माहिती देण्यात येणार असून, जळगावची जागा शिवसेनेलाच मिळावी यासाठी जोरदार आग्रह धरण्यात येणार आहे.
दरम्यान, जागावाटपात शिवसेनेला डावलण्याचा प्रयत्न झाल्यास ‘मैत्रीपूर्ण लढत’ करण्याचा पर्यायही चर्चेत असल्याने महायुतीत अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता मुंबईतील बैठकीनंतर वरिष्ठ नेतृत्व काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.






