नवराज्यLive न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. जळगावच्या खासदार Smita Wagh यांना सलग दुसऱ्यांदा प्रतिष्ठेचा ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकसभेतील प्रभावी कामगिरी, लोकहिताच्या प्रश्नांवरील अभ्यासू मांडणी आणि संसदीय कामकाजातील सातत्यपूर्ण सक्रियतेची दखल घेत हा राष्ट्रीय सन्मान त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
संसद रत्न पुरस्कार २०२६ साठी ज्युरी समितीने देशभरातील केवळ १० लोकसभा खासदार, २ राज्यसभा खासदार आणि संसदीय स्थायी समित्यांच्या ४ सदस्यांची निवड केली आहे. या मानाच्या यादीत जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ यांच्यासह पुण्यातील मेधा कुलकर्णी या दोन महिला नेत्यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, गंभीर आजाराशी झुंज देत असतानाही स्मिताताई वाघ यांनी लोकसेवेचा ध्यास कायम ठेवला. संसदेतील त्यांची उपस्थिती तब्बल ९६ टक्के राहिली असून त्यांनी २६९ प्रश्न उपस्थित करत विविध लोकहिताच्या विषयांना संसदेत वाचा फोडली.

याशिवाय ५३ चर्चांमध्ये सहभाग घेत मतदारसंघातील प्रश्न प्रभावीपणे मांडले. तसेच ५ खासगी विधेयके सादर करत त्यांनी संसदीय कार्यात आपली अभ्यासू छाप उमटवली.गेल्या वर्षीही संसदरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या स्मिताताई वाघ यांनी सलग दुसऱ्यांदा हा राष्ट्रीय सन्मान मिळवत जळगाव जिल्ह्याचा नावलौकिक देशपातळीवर उंचावला आहे. त्यांच्या या यशामुळे जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.







