नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव- एमआयडीसी परिसरातील एका औद्योगिक कंपनीत पगारवाढ आणि कंत्राटी पद्धत बंद करण्याच्या मागणीवरून कामगारांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. दोन कर्मचाऱ्यांना कामावर न घेतल्याच्या निषेधार्थ कामगारांनी कंपनीतील दोन प्लांट बंद ठेवत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उज्ज्वल प्रकाश कोळी हे गेल्या पाच वर्षांपासून संबंधित कंपनीत कार्यरत असून त्यांना दररोज 471 रुपये वेतन मिळत होते. मागील वर्षापासून पगारवाढ न झाल्याने त्यांनी वेतनवाढीची मागणी केली होती. मात्र, या मागणीनंतर त्यांना लक्ष्य करून 2 मे 2026 रोजी कामावरून घरी बसवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
व्यवस्थापनाकडून “एक महिन्यानंतर संपर्क करू” असे सांगण्यात आले होते. मात्र, या निर्णयाविरोधात कंपनीतील इतर कामगार आक्रमक झाले असून, संबंधित कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घेतल्याशिवाय कामावर हजर होणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.

कामगारांच्या या भूमिकेमुळे कंपनी प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्याला काही दिवस थांबण्यास सांगितले. मात्र, अद्यापही कामावर न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या परिस्थितीत उद्भवणाऱ्या कोणत्याही परिणामास व्यवस्थापन जबाबदार राहील, असे कामगारांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, संतप्त कामगारांनी गणेश कॉलनी येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात निवेदन देत पगारवाढ, कंत्राटी पद्धत बंद करणे आणि सलग सेवेनुसार कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी केली आहे. दोन कर्मचाऱ्यांना कामावर न घेतल्याच्या निषेधार्थ कामगारांनी कंपनीतील दोन प्लांट बंद ठेवत लाक्षणिक आंदोलनही केले.

या प्रकरणामुळे एमआयडीसी परिसरातील औद्योगिक वातावरणात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून यावर तोडगा काढला जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







