नवराज्य Live न्यूज नेटवर्क
गुजरातहून नववधूला सासरी घेऊन निघालेल्या कुटुंबावर दुर्दैवाचा घाला कोसळला. धरणगाव तालुक्यातील वराड फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हे वऱ्हाड गुजरातमधील वापी येथून अकोल्याच्या दिशेने प्रवास करत होते. दरम्यान, वराड परिसरात पोहोचताच क्रुझर वाहनाचे पुढील चाक अचानक निखळले. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या ट्रकवर जोरदार धडक बसली. धडकेनंतर वाहन उलटल्याने अपघाताची तीव्रता वाढली.

या दुर्घटनेत पूजा रवी वाघळकर (२५) या नववधूसह दत्तू तुळशीराम भागवत (४२) आणि जगदीश चंदूभान वाघळकर (५२) यांचा मृत्यू झाला. अपघातात एका लहान मुलासह सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी अंश नितेश कडोले (१४) याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. वातावरणात शोककळा पसरली असून, लग्नाचा आनंद काही क्षणांतच दुःखात बदलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, धरणगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






