नवराज्य Live न्यूज नेटवर्क
आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात शिक्षणाची व्याप्ती केवळ पाठ्यपुस्तकांपुरती मर्यादित राहिलेली नाही. शिक्षण म्हणजे केवळ गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा विकास, नैतिक मूल्यांची जपणूक आणि जीवन कौशल्यांची जोपासना होय.असे मत श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय, मेहरूण चे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी व्यक्त केले आहे

सध्याच्या परिस्थितीत शिक्षणाचे केंद्र अनेकदा ‘गुण’ आणि ‘परीक्षा’ यांभोवती फिरताना दिसते. मात्र, खऱ्या अर्थाने शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला शिकवणे, नव्या कल्पनांना वाव देणे आणि अपयशातून उभे राहण्याची ताकद देणे होय. बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना, त्याचा योग्य आणि जबाबदारीने उपयोग करणे हीदेखील तितकीच महत्त्वाची बाब आहे.
पालक, शिक्षक आणि समाज या तिन्ही घटकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मुलांवर अनावश्यक स्पर्धेचा ताण न आणता त्यांच्या आवडी-निवडी ओळखून योग्य मार्गदर्शन देणे आवश्यक आहे. प्रत्येक मूल वेगळे असते; त्याच्या क्षमतेनुसार संधी दिल्यासच शिक्षणाची खरी उद्दिष्टे साध्य होऊ शकतात.

आज गरज आहे ती विद्यार्थ्यांना केवळ ‘हुशार’ नव्हे, तर ‘सुजाण’ नागरिक बनवण्याची. प्रामाणिकपणा, शिस्त, सहकार्य आणि संवेदनशीलता यांसारख्या मूल्यांची रुजवण शिक्षणातूनच होणे गरजेचे आहे.
शिक्षण अधिक अर्थपूर्ण, मूल्याधारित आणि विद्यार्थी-केंद्रित करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. कारण आजचे विद्यार्थीच उद्याचे जबाबदार नागरिक घडवणार आहेत.






