नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव – विमानतळ विकास प्रकरणातील कायदेशीर लढाईत मनपाला सोमवारी एकाच दिवशी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात मोठे धक्के बसले आहेत. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेची याचिका थेट फेटाळून लावली तर दुसरीकडे ११ कोटी रुपयांचा धनादेश न दिल्याने उच्च न्यायालयात महापालिकेविरुद्ध न्यायालय अवमान याचिका दाखल झाली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या कायदेशीर प्रक्रियेसाठी नगरसेवक अरविंद देशमुख यांनी दिल्लीत तळ ठोकला होता. मात्र, सोमवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने मनपाची याचिका फेटाळून लावली: मुंबई उच्च न्यायालयाने १७ एप्रिल रोजी अटलांटा कंपनीला ११ कोटी रुपये देण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. या आदेशाला काही काळ स्थगिती मिळाल्याने महापालिकेला तात्पुरता दिलासा मिळाला होता.
मात्र, सोमवारी या प्रकरणावर पुन्हा कामकाज झाले. या वेळी न्यायालयाचे स्पष्ट आदेश असूनही महापालिकेने अद्याप ११ कोटींचा धनादेश दिलेला नाही, असा दावा करत अटलांटा कंपनीने मनपाविरुद्ध थेट अवमान याचिका दाखल केली. न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली असून, या प्रकरणावर आता ३० एप्रिल रोजी पुढील सुनावणी आहे.
त्यामुळे या सुनावणीत काय होते याबाबत आता लक्ष लागले आहे.






