नवराज्य न्यूज नेटवर्क
जळगाव (प्रतिनिधी):
मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील बोरीगाव परिसरात शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृतांमध्ये श्याम विक्रम ठाकूर (४५), शोभा विक्रम ठाकूर (४०) आणि शिवन्या श्याम ठाकूर (५) यांचा समावेश आहे. जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकूर कुटुंबीय उज्जैन, ओंकारेश्वर आणि सिहोर येथे धार्मिक दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून आपल्या मूळ गावी परतत असताना पहाटेच्या सुमारास चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्त्यावर उलटली आणि अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की काही जणांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शोभा ठाकूर व चिमुरडी शिवन्या हिचा मृत्यू झाला. उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
या दुर्घटनेमुळे वरणगाव फॅक्टरी परिसर तसेच दयापूर शिवारात शोककळा पसरली असून ठाकूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.







