नवराज्य Live न्यूज नेटवर्क
मुंबई/जळगाव (प्रतिनिधी):महाराष्ट्रातील प्रशासन अधिक कार्यक्षम, लोकाभिमुख आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. राज्यात तब्बल ११ नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू असल्याची चर्चा सध्या जोर धरत असून, त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचा समावेश असल्याने स्थानिक पातळीवर उत्सुकता वाढली आहे.

राज्य सरकारने अलीकडेच ११ नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयांना मंजुरी दिली आहे. या निर्णयाकडे भविष्यातील नवीन जिल्हे निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
ज्या ठिकाणी अपर जिल्हाधिकारी कार्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे, त्यामध्ये
ठाणे (कल्याण), रत्नागिरी (दापोली), पुणे (बारामती), सातारा (फलटण), सोलापूर (पंढरपूर), जळगाव (चाळीसगाव), अमरावती (अचलपूर), यवतमाळ (पुसद), बुलढाणा (खामगाव), नांदेड (किनवट) आणि नागपूर (कळमेश्वर) यांचा समावेश आहे.

या सर्व ठिकाणी भविष्यात स्वतंत्र जिल्हे निर्माण करण्याचे प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असल्याचे समजते. विशेष म्हणजे, चाळीसगावला जिल्ह्याचा दर्जा मिळण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने जळगाव जिल्ह्यात या निर्णयाकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे.
दरम्यान, राज्यात एकूण २० नवीन जिल्हे आणि ८१ नवीन तालुके निर्माण करण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर सध्याच्या हालचालींना वेग आला असल्याचे संकेत मिळत आहेत.
मात्र, या सर्व निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब होण्यासाठी आगामी जनगणनेची आकडेवारी महत्त्वाची ठरणार असून, त्यानंतरच नवीन जिल्ह्यांबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.







