नवराज्यLive न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील काही भागात मागील काही दिवसांपासून पिवळसर पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी सोमवारी उमाळा जलशुद्धीकरण प्रकल्पाची तातडीने पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत पाणीपुरवठा यंत्रणेची सखोल तपासणी केली.
दारकानगर, अयोध्यानगर, सत्यम पार्क, खोटेनगर आदी परिसरांत पिवळसर पाणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सभापतींनी प्रकल्पावर भेट देत जलशुद्धीकरण प्रक्रिया, गाळणी यंत्रणा आणि क्लोरीनच्या वापराबाबत सविस्तर माहिती घेतली.

पाहणीदरम्यान प्रकल्पातील विविध ठिकाणांहून पाण्याचे नमुने घेऊन त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसून पाणीपुरवठ्यातील त्रुटी तातडीने दूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी श्यामकांत भांडारकर, राहुल पाटील, विजय चौधरी, योगेश जाधव आदी उपस्थित होते.

तापमानामुळे रंगात बदल
दरम्यान, अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी जलकुंभांमध्ये पाणी साठवून त्यात निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीन टाकले जाते. उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे ही प्रक्रिया अधिक वेगाने होत असल्याने पाण्याला किंचित पिवळसर छटा येते. काही वेळाने हे पाणी स्वच्छ व पारदर्शक होते, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.







