नवराज्य Live न्यूज नेटवर्क
शिरसोली : शिरसोली व परिसरात अलीकडे झालेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढणीच्या टप्प्यात असलेली पिके वाऱ्यामुळे आडवी पडल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बदलत्या हवामानाचा फटका शेतीला बसला असून, मका, ज्वारीसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये पिके जमिनीवर कोसळल्याने त्यांची गुणवत्ता घसरली असून उत्पादनावरही परिणाम होणार आहे.
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामा करण्याची मागणी केली आहे. तलाठी कार्यालयाकडून पंचनामा करण्यात विलंब होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून व्यक्त होत असून यामुळे नाराजीचे वातावरण आहे.
महसूल विभागाने त्वरीत पाहणी करून नुकसानाची नोंद घ्यावी व शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.







