जळगाव (योगेश सुने, चीफ एडिटर) : जळगाव जिल्ह्यात अलीकडेच वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतकरी उध्वस्त झाले आहेत. मात्र, सत्ताधारी मंत्री व लोकप्रतिनिधींनी या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली.

राऊत म्हणाले की, “जिल्ह्यातील सत्ताधारी लोक २४ तास केवळ राजकारणात व्यस्त आहेत. शेतकरी संकटात असताना तथाकथित ‘संकटमोचक’ कुठे आहेत?” त्यांनी पुढे सवाल केला की, “हे संकटमोचक फक्त राजकीय संकट सोडवण्यासाठीच आहेत का? शेतकऱ्यांवर आणि जनतेवर संकट आले की ते दिसतच नाहीत. आमदार पळवणे, नगरसेवक फोडणे आणि पक्षांतर घडवून आणणे हेच त्यांचे काम आहे का? हे राज्य आणि जिल्ह्याचे दुर्दैव आहे.”
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असताना जिल्ह्याचे पालकमंत्री Gulabrao Patil तसेच सत्ताधारी आमदारांनी शेतकऱ्यांची साधी विचारपूसही केलेली दिसत नाही, असा आरोप राऊत यांनी केला. “या कठीण काळात शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
⚡ जिल्ह्यात ‘राजकीय हुकूमशाही’चा आरोप
राऊत यांनी पुढे जिल्ह्यात ‘राजकीय हुकूमशाही’ सुरू असल्याचा गंभीर आरोप केला. “पोलिसांच्या मदतीने गुंडगिरी केली जात असून पोलिसांनी स्वतःला वर्दीतील गुंड समजू नये. वर्दीतील गुंडगिरी ही तानाशाहीचे लक्षण आहे,” असे ते म्हणाले. तसेच, सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री आणि आमदार राजकीय विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी पोलिस यंत्रणेचा वापर करत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
🔥 शिंदे गटातील आमदार भाजपकडून लढवणार?
यावेळी राऊत यांनी एक मोठा राजकीय दावा करत खळबळ उडवली. जळगाव जिल्ह्यातील पारोळा, पाचोरा आणि मुक्ताईनगर भागातील शिंदे गटाचे काही आमदार भाजपच्या संपर्कात असून आगामी निवडणूक ते भारतीय जनता पक्षाकडून लढवू शकतात, अशी “पक्की माहिती” असल्याचा दावा त्यांनी केला.
या वक्तव्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.







