नवराज्य Live न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जळगाव जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र (KVK) येथील कथित भ्रष्टाचार आणि गंभीर अनियमिततेचा मुद्दा खासदार स्मिताताई वाघ यांनी संसदेत जोरदारपणे उपस्थित केला. त्यांनी केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्र्यांचे या प्रकरणाकडे लक्ष वेधत तात्काळ चौकशीची मागणी केली.भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) कडून मिळणाऱ्या सरकारी निधीचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी आहेत.यासोबतच केंद्रातील जुनी झाडे अनधिकृतपणे तोडणे, ट्रॅक्टर व इतर यंत्रसामग्रीचा वैयक्तिक वापर करणे अशा गंभीर अनियमितता उघड झाल्या आहेत.
“कृषी विज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अपेक्षित सुविधा व मदत मिळत नाही. मी स्वतः केंद्राचा दौरा केला असता अनेक त्रुटी व गैरप्रकार समोर आले,” असे त्यांनी संसदेत स्पष्ट केले. या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, हा मुद्दा यापूर्वी महाराष्ट्र विधान परिषदेतही मांडण्यात आला होता, तरीही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कृषी विज्ञान केंद्रे त्यांच्या मूळ उद्देशानुसार कार्यरत राहतील याची खात्री करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या मुद्द्यावर कृषी मंत्रालयाकडून लवकरच उत्तर अपेक्षित असून, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये या केंद्राविषयी नाराजी असल्याचेही समोर आले आहे. खासदार स्मिताताई वाघ यांनी हा प्रश्न संसदेत उपस्थित करून शेतकऱ्यांचा आवाज राष्ट्रीय पातळीवर पोहोचवला आहे.







