नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : खान्देशातील सुप्रसिद्ध गोखलेज् अॅडव्हान्सड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (गती) तर्फे आयोजित छायाचित्र प्रदर्शनाला सलग दोन वर्षांपासून रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. याच परंपरेत, येत्या ०६ मार्च २०२६ रोजी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तसेच मार्च महिन्यातील जागतिक जल दिनाचे औचित्य साधून ‘दुर्गांचे जलसंस्कार’ या विषयावर एकदिवसीय छायाचित्र प्रदर्शन व माहितीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गबांधणी करताना जलव्यवस्थापनाला अत्यंत महत्त्व दिले होते. अनेक दुर्गांवर नैसर्गिक तसेच खडक खोदून तयार केलेले टाके, तलाव आणि विहिरी आजही आढळतात. किल्ल्यांवरील पाणीसाठ्यांवरून त्या दुर्गावरील शिबंदी, वस्ती, पर्जन्यमान तसेच दुर्गाचे सामरिक महत्त्व याचा अंदाज बांधता येतो. त्यामुळे हे केवळ पाण्याचे व्यवस्थापन नसून दुर्गांवर घडवलेले ‘जलसंस्कार’ होते, असे अभ्यासकांचे मत आहे.
या प्रदर्शनात रश्मी गोखले यांनी विविध किल्ल्यांवरील जलसाठ्यांची अभ्यासपूर्ण छायाचित्रे सादर केली आहेत. ‘गती’ संस्थेमार्फत मागील आठ वर्षांपासून दुर्ग संस्कृती या नाविन्यपूर्ण विषयावर संशोधनात्मक कार्य सुरू असून, त्याअंतर्गत कार्यशाळा, व्याख्याने, पुस्तक लेखन, दृकश्राव्य सादरीकरणे तसेच छायाचित्र प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येते.
हे छायाचित्र प्रदर्शन जळगाव शहरातील पीएनजी ज्वेलर्स (जिल्हा बँकेसमोर) येथे दुपारी १२.०० ते रात्री ८.०० या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. याच दिवशी सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत “Clicks च्या कथा” या विषयावर माहितीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानातून छायाचित्रांमागील कथा, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व तसेच किल्ल्यांवरील जलसाठ्यांची रचना व व्यवस्थापन याविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
दुर्ग संस्कृती अभियानांतर्गत एकूण ८ कॉर्पोरेट प्रशिक्षण कार्यक्रम आणि २ उपक्रम राबविले जात असून, छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गांवर अमलात आणलेल्या नियम, प्रक्रिया आणि प्रणाली यांचा अभ्यास करून त्यांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित केली जाते. आजवर २३० हून अधिक प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत.
जळगावकरांनी या छायाचित्र प्रदर्शनाचा तसेच “Clicks च्या कथा” या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दुर्ग संस्कृती कोअर टीमचे सदस्य देवदत्त गोखले, रश्मी गोखले, प्रवीण महाजन व श्रीरंग छापेकर यांनी केले आहे.






