नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव, दि. १ :सरकारकडून सध्या सर्व काही फुकट देण्याची प्रवृत्ती वाढत आहे. धान्य फुकट, वीज फुकट यामुळे समाजाची इच्छाशक्ती कमकुवत होत असून ही फुकटची सवय समाजाला पंगू बनवत आहे, असे ठाम मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. जळगाव येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिर येथे आयोजित ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.
हा पुरस्कार सोहळा केशवस्मृती प्रतिष्ठान आणि जळगाव जनता सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
“हिवरेबाजारमध्ये फुकट काहीच नाही”
पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की, “आमच्या हिवरेबाजार गावात आम्ही कधीच काही फुकट दिले नाही. लोकसहभाग आणि श्रम यावरच गाव उभे राहिले आहे. आता बजेटमधून पत्त्याचा कॅट आणि दारू द्यायचेच बाकी आहे,” असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. फुकट संस्कृतीमुळे आत्मनिर्भरतेऐवजी परावलंबित्व वाढत असल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
तापमान बदल हे मोठे जागतिक संकट
ते पुढे म्हणाले की, तापमान बदलामुळे जगासमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. माती आणि पाण्याचे प्रदूषण वाढत असून त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. पुढील २५ वर्षांत शेतीसमोरील आव्हाने अधिक गंभीर असतील. त्यामुळे आजच योग्य नियोजन आणि लोकसहभागातून उपाययोजना करणे गरजेचे आहे.
पुरस्कार वितरण सोहळा
या कार्यक्रमात कोल्हापूर येथील अवनी फाउंडेशनच्या कार्यकर्त्या अनुराधा भोसले यांना वैयक्तिक सेवा पुरस्कार, तर नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्मर्स कंपनीला संस्थास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
केशवस्मृतीने शहर स्वच्छतेचा विडा उचलावा – अनुराधा भोसले
पुरस्कार स्वीकारताना अनुराधा भोसले म्हणाल्या की, केशवस्मृती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांमध्ये सेवाभाव आणि आत्मीयता दिसते. या संस्थेने आता शहर स्वच्छतेचा विडा उचलावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. शिक्षणाशिवाय समाजपरिवर्तन शक्य नसल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.
शेतीला व्यवसाय म्हणून पाहण्याची गरज – विलास शिंदे
सह्याद्री फार्मर्स कंपनीचे प्रतिनिधी विलास शिंदे यांनी सांगितले की, शेतीत अनेक गुंते निर्माण झाले आहेत. एकट्याने नव्हे तर समूहाच्या ताकदीनेच शेतीत बदल घडवता येतो. शेतीकडे सेवा नव्हे तर व्यवसाय म्हणून पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.






