जळगाव – योगेश सुने (नवराज्य Live संपादक) जळगाव जिल्ह्यात जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण २०३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक नोंद समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार या प्रकरणांपैकी ११५ प्रकरणे मदतीस पात्र ठरविण्यात आली असून, ७८ प्रकरणे अपात्र, तर १० प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. तीन मंत्र्यांच्या जिल्ह्यात शेतकऱ्याच्या वाढत्या आत्महत्या याबाबतीत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महिन्यानुसार पाहता, मार्च २०२५ या महिन्यात सर्वाधिक २९ शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद आहे. त्याखालोखाल फेब्रुवारी आणि जुलै महिन्यात प्रत्येकी २३, तर डिसेंबर २०२५ मध्ये २२ आत्महत्यांची नोंद झाली आहे. वर्षातील प्रत्येक महिन्यात आत्महत्यांचे प्रमाण कायम राहिले असून, ही बाब जिल्ह्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
मंत्र्यांचा जिल्हा असून देखील शेतकऱ्याच्या पदरी निराशा.!
जळगाव जिल्ह्याला तीन मंत्री, तीन खासदार आहेत. तर मुख्यमंत्र्यांच्या व उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचे देखील दोन मंत्री आहेत. सर्वश्रुत आहे मात्र,तरी देखील शेतकऱ्याच्या पदरी निराशा का? असा सवाल शेतकरी वर्गामधून करत आहे.
शेती करणे खूप कठीण झाले असून, कर्ज काढून शेतकरी पेरणी करतो त्यातही अस्मानी, सुलताने संकट आल्यानंतर, शासन मदतीसाठी कागदी घोडे लागतात. व त्यातही तो शेतकरी पात्र ठरेलच याची काय हमी. तो मिळणाऱ्या तूट पुंजा मदतीने तो त्याचा खर्च कसा भागवणार.
शेतमालाला मिळणारा अपुरा दर, कर्जबाजारीपणा, वाढते उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्ती तसेच आर्थिक ताणतणाव यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत असल्या तरी आत्महत्यांची संख्या थांबलेली नसल्याचे वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मात्र शेतकऱ्याला मंत्र्यांचे पाठबळ मिळण्याची अपेक्षा आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत, कर्जमाफी, हमीभाव आणि मानसिक आधार देणारी प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे मत शेतकरी वर्ग व सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.







