प्रेम केलं… पण ती निघाली तृतीयपंथी !
पिछा सोडवण्यासाठी पहुरच्या तरुणांकडून तृतीयपंथीचा खून; एलसीबीकडून आरोपीला ४८ तासांत बेड्या
नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पद्मालय वनपरिक्षेत्रात एका महिलेचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. या अंधाऱ्या खुनाचा छडा लावण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, अवघ्या ४८ तासांत आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे. सदर महिला तृतीय पंथी असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पिच्छा सोडत नसल्याने सदर आरोपीने हे कृत्य केल्याचे दिसून आले आहे.
४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पद्मालय ते नागदुली रस्त्यावरील जंगलात एका अज्ञात महिलेचा विद्रूप अवस्थेतील मृतदेह सापडला होता. ओळख पटू नये म्हणून आरोपीने महिलेचा चेहरा आणि छातीचा भाग ज्वलनशील पदार्थ टाकून पूर्णपणे जाळला होता. हे ठिकाण निर्जन आणि डोंगरदऱ्यांचे असल्याने तपास करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने ४ पथके तयार केली होती.
मृतदेहाच्या पायाच्या नखांवरील ‘मॅजंटा’ रंगाचे नेलपॉलिश आणि डाव्या नाकपुडीतील सोन्याची ‘मुरणी’ यावरून महिलेची ओळख पटवण्यास मदत झाली. मृतदेहावरील अळ्यांच्या वाढीवरून तज्ज्ञांनी या महिलेचा मृत्यू ३० किंवा ३१ जानेवारी रोजी झाल्याचा निष्कर्ष काढला.
गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी गोलू उर्फ स्वप्नील अशोक पाटील (वय २७, रा. पहूर, ता. जामनेर) याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली. मृत महिला ही तृतीयपंथी असून तिचे नाव आकाक्षा उर्फ अजय हेमराज गेड्रे (रा. सोनसरार, जि. राजनांदगाव, छत्तीसगड) असल्याचे निष्पन्न झाले. आकांक्षासोबत आरोपीचे प्रेमसंबंध होते.
त्यांच्यातील दोघांच्या प्रेम संबंधांमध्ये स्वप्निलने इच्छा सोड म्हणून तिला सांगितले होते. मात्र आकांक्षा ऐकत नव्हती. त्यामुळे त्याने तिला सुरत वरून बोलावले. त्यानंतर पद्मालयच्या जंगलात नेऊन रागाच्या भरात आरोपीने तिच्या डोक्यात प्रहार केला व ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने स्वतःच्या मोटारसायकलमधील पेट्रोल काढून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सोपान गोरे, शरद बागल, जितेंद्र वल्टे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. या धाडसी कारवाईचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.







