तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देणारे नेतृत्व हरपले – आ. सुरेश भोळे यांची अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली
नवराज्य Live न्यूज नेटवर्क | जळगाव
तळागाळातील कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने बळ देणारे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे अजितदादा आज आपल्यात नाहीत, ही महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अपूरणीय हानी आहे, अशा शब्दांत जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजुमामा) यांनी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
आमदार भोळे म्हणाले की, अजितदादांच्या कार्यपद्धतीबद्दल ऐकून होतो; मात्र त्यांच्या सोबत प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाल्याने ती कार्यपद्धती जवळून अनुभवता आली. प्रशासनावर असलेली त्यांची मजबूत पकड, कठीण परिस्थितीतही धाडसी व ठाम निर्णय घेण्याची त्यांची क्षमता आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांप्रती असलेली त्यांची संवेदनशीलता हे गुण प्रत्यक्ष पाहता आले, असे त्यांनी नमूद केले.
अजितदादांचे नेतृत्व हे केवळ राजकीय मर्यादांपुरते नव्हते, तर ते कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान होते. प्रत्येक कार्यकर्त्याला आपलेसे मानून त्याच्या पाठीशी उभे राहणारा नेता म्हणून अजितदादांची ओळख होती, असेही आमदार भोळे यांनी सांगितले.
अजितदादांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी असून त्यांच्या आठवणी आणि कार्य कायम स्मरणात राहील, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत अजितदादांना श्रद्धांजली वाहिली.







