जीवाचे रान करणारा नेता हरवला
जळगाव – अजितदादा पवार अपघाती निधन ही वार्ता अत्यंत दु:खद आणि वेदनादायी आहे. नेहमी प्रसन्न, स्वागतशील आणि सर्वसामान्यांशी आपुलकीने संवाद साधणारे व्यक्तिमत्त्व म्हणून अजितदादा पवार ओळखले जात होते. स्वतःची खास कार्यशैली विकसित केलेले ते कर्तबगार आणि धाडसी नेतृत्व होते.
शिस्त, वेळेचे काटेकोर नियोजन आणि दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पाळण्याची बांधिलकी हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य होते. राजकीय क्षेत्रात स्पष्टवक्तेपणा अडचणी निर्माण करतो, मात्र दादा नेहमीच धैर्यशील आणि कणखर राहिले.
जैन इरिगेशन व शेती क्षेत्रासाठी दादांचे योगदान
अजितदादा पवार हे जैन इरिगेशन सिस्टिम्सच्या विविध प्रकल्पांना नियमित भेटी देत असत. जळगाव दौऱ्यावर आले की पहाटेच जैन हिल्स येथे शेतीतील नवनवीन प्रयोगांची पाहणी करण्याची त्यांची खास परंपरा होती.
शेती संशोधन, जलसंधारण आणि शाश्वत विकास या विषयांवर श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्याशी दादांचा झालेला संवाद आजही आठवणींमध्ये ताजा आहे.
कांताई बंधारा : जलसंधारणाचे आदर्श उदाहरण
१६ ऑक्टोबर २०१३ रोजी कांताई बंधाऱ्याचे उद्घाटन अजितदादा पवार यांच्या हस्ते झाले होते. यावेळी त्यांनी म्हटले होते की,
“पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य व्यवस्थापनातून जलसंधारणाचा प्रश्न सोडवता येतो. कांताई बंधारा हा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) आधारित राज्यातील पहिलाच आदर्श प्रकल्प आहे.”
राज्य व देशासाठी अपूरणीय हानी
अजितदादा पवार यांच्या आकस्मिक जाण्याने केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या सार्वजनिक जीवनाची मोठी हानी झाली आहे. आपल्या कुटुंबातील सदस्य गमावल्याची वेदना प्रत्येकाला जाणवत आहे.
अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली.
—
अशोक जैन
अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगाव
जैन इरिगेशनच्या भेटीप्रसंगी अजित पवारांसोबत अशोक जैन, जयंत पाटील, अजित जैन, अतुल जैन, अभय जैन







