नवराज्य Live डिजिटल न्यूज नेटवर्क
जळगाव – महानगरपालिकेचे कामकाज ठप्प झाल्याचा आरोप करत जळगाव प्रथम संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना तात्काळ हटविण्याची मागणी केली आहे. आयुक्त गेल्या काही दिवसांपासून रजेवर असल्याने शहरातील महत्त्वाची कामे ठप्प झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संस्थेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विविध विभागांचे निर्णय प्रलंबित राहिल्याने रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, बांधकाम विभागाची कामे ठप्प झाली आहेत. विभागप्रमुखांना मार्गदर्शन मिळत नसल्याने प्रशासनिक हालचाल पूर्णतः मंदावली आहे. शहरातील दैनंदिन सेवा आणि तातडीच्या कामांवर प्रतिकूल परिणाम होत असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
प्रशासन सुरळीत चालावे यासाठी सक्षम, सक्रिय आणि पूर्णवेळ उपलब्ध राहील अशा अधिकाऱ्याची नियुक्ती करणे आवश्यक असल्याची मागणी संस्थेने केली आहे. आयुक्त ढेरे यांची बदली करून शहराच्या हिताचे निर्णय तातडीने व्हावेत, असे निवेदनात स्पष्टपणे नमूद आहे.
निवेदन देताना कैलास कासार, ईश्वर मोरे, ऍड. सागर चित्रे, डॉ. किशोर माळी, माजी महापौर करीम सालार, किरण तळले, भूषण ठाकूर, पंकज राजपूत, मुकुंद सपकाळे, प्रकाश जोशी, नितीन माळी, अविनाश पाटील, राहुल चव्हाण, डॉ. नितीन धांडे, ऍड. डी. एस. भालेराव आदी उपस्थित होते.







