नवराज्य Live न्यूज नेटवर्क
भुसावळ : भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदावरून अपात्र ठरवण्यात आलेल्या गायत्री भंगाळे यांनी शासनाच्या निर्णयाला आव्हान दिले असून, त्यांच्या याचिकेवर आज खंडपीठात सुनावणी होणार आहे. या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून विजयी झालेल्या भंगाळे यांना अवघ्या चार महिन्यांतच अपात्रतेचा सामना करावा लागला. त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रारी दाखल झाल्यानंतर जिल्हा जात पडताळणी समितीने २३ एप्रिल रोजी त्यांचे प्रमाणपत्र रद्द केले होते.
या निर्णयानंतर राज्याच्या नगरविकास विभागानेही तत्काळ कार्यवाही करत भंगाळे यांचे नगराध्यक्षपद रद्द करण्याचा आदेश दिला. यामुळे शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या निर्णयाविरोधात भंगाळे यांनी न्यायालयात धाव घेतली असून, खंडपीठात याचिका दाखल केली आहे. आज होणाऱ्या सुनावणीत न्यायालय कोणता निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात या निकालाचा स्थानिक राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, न्यायालयाचा निकाल भंगाळे यांच्या बाजूने न लागल्यास भुसावळ नगरपालिकेत पोटनिवडणुकीची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.







