नवराज्य Live न्यूज नेटवर्क
बदलत्या न्यायप्रणालीच्या पार्श्वभूमीवर नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रविवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकारांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या उपक्रमात विविध माध्यमांच्या प्रतिनिधींना नव्या कायद्यांतील तरतुदी, त्यातील महत्त्वाचे बदल आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित तसेच पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धारबडे यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून विषय स्पष्ट केला.
यावेळी सांगण्यात आले की, जुने ब्रिटीशकालीन कायदे मागे टाकत देशात आधुनिक तंत्रज्ञान आणि भारतीय मूल्यांवर आधारित कायदे लागू करण्यात आले आहेत. या नव्या व्यवस्थेमुळे गुन्ह्यांच्या तपासात गती येईल, न्यायप्रक्रिया अधिक पारदर्शक बनेल आणि नागरिकांना जलद न्याय मिळण्यास मदत होईल. गुन्ह्यांचे वर्गीकरण, शिक्षेतील बदल आणि डिजिटल साधनांचा वापर यावरही सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यशाळेला प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांतील पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी स्पष्ट आणि समाधानकारक उत्तरे दिली. पोलीस अधीक्षकांनी यावेळी नमूद केले की, समाजापर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यात माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक सक्षम करण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त ठरतात.
या उपक्रमामुळे जळगाव जिल्ह्यात पोलीस प्रशासन आणि पत्रकार यांच्यातील समन्वय अधिक बळकट होण्यास मदत झाली आहे. नव्या कायद्यांविषयी जनजागृती वाढून नागरिकांना त्याचे फायदे समजण्यास मदत होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.





