नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जनगणना ही देशाच्या विकासाचा पाया असून नागरिकांनी अचूक माहिती देत या राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त पोलिस कवायत मैदानावर आयोजित शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह विविध अधिकारी व नागरिक उपस्थित होते. पाटील यांनी सांगितले की, यंदाची जनगणना पूर्णतः डिजिटल पद्धतीने होणार असून १ मे ते १५ मे दरम्यान “स्वयं गणना” सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
आरोग्य क्षेत्रात जिल्ह्याने प्रगती साधत अनेक आरोग्य केंद्रांना राज्यस्तरीय मानांकन मिळाले असून आयुष्यमान भारत योजनेतून लाखो नागरिकांना लाभ मिळाल्याचे त्यांनी सांगितले. रोजगार निर्मिती योजनेत नवीन उद्योगांना मंजुरी मिळून रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत, तर नैसर्गिक आपत्तीत बाधित शेतकऱ्यांना कोट्यवधींची मदत वितरित करण्यात आली आहे.
कामगार कल्याण योजनांमधून हजारो कामगारांना विविध लाभ देण्यात आले असल्याचेही त्यांनी नमूद केले. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारी बाहेर पडणे टाळून आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी परेडची मानवंदना स्वीकारली व विविध विभागातील उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.





