नवराज्य Live न्यूज नेटवर्क
उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यासह अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा धोका गंभीर होत चालला आहे. सलग काही दिवस तापमान प्रचंड वाढणे, रात्रीही गारवा न मिळणे आणि अंगावर जाळ बसल्यासारखे वाटणे ही केवळ साधी गरमी नसून ‘उष्णतेची लाट’ असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
गावोगावी वाढता धोका लक्षात घेता नागरिकांनी आरोग्याची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन महादेव हॉस्पिटलचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांनी केले आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते. परिणामी रक्तदाब बिघडणे, तसेच मेंदू, हृदय आणि मूत्रपिंडांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. वेळेत उपचार न मिळाल्यास ही स्थिती जीवघेणी ठरू शकते.

उष्णतेच्या परिणामांची सुरुवात साध्या लक्षणांनी होते. प्रचंड तहान लागणे, डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, चिडचिड, हात-पायांना गोळे येणे आणि मळमळ ही सुरुवातीची चिन्हे आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास ‘हीट एक्सॉश्शन’ आणि पुढे ‘हीट स्ट्रोक’चा धोका वाढतो. हीट स्ट्रोकमध्ये रुग्ण गोंधळलेला दिसतो, घाम येणे थांबते, शरीराचे तापमान वाढते आणि बेशुद्ध पडण्याची शक्यता असते.
ग्रामीण भागात हा धोका अधिक तीव्र असल्याचेही त्यांनी नमूद केले. शेतकाम, बांधकाम, पाण्यासाठीची पायपीट आणि उन्हात प्रवास यामुळे नागरिक दीर्घकाळ उन्हाच्या संपर्कात राहतात. तसेच अनेक ठिकाणी थंड जागा, पंखे किंवा पुरेसे पाणी उपलब्ध नसते. वृद्ध, लहान मुले, गर्भवती महिला तसेच मधुमेह, हृदयविकार किंवा किडनीच्या आजारांनी ग्रस्त रुग्ण विशेषतः धोक्यात आहेत.

तज्ज्ञांच्या मते, उष्णतेपासून बचावासाठी नियमित पाणी पिणे अत्यावश्यक आहे. तहान लागण्याची वाट न पाहता वारंवार पाणी, ताक, लिंबूपाणी किंवा ओआरएस घ्यावे. दुपारच्या कडाक्याच्या उन्हात काम टाळून शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी काम करावे. सैल व फिकट रंगाचे कपडे परिधान करणे, डोक्यावर टोपी किंवा ओढणी ठेवणे आणि अधूनमधून सावलीत विश्रांती घेणे गरजेचे आहे.
घरातही उष्णतेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. दिवसा खिडक्या व पडदे लावून ऊन आत येऊ देऊ नये. लहान मुले व वृद्धांना हवेशीर व थंड जागेत ठेवावे. गाडीत किंवा बंद जागेत कोणालाही एकटे सोडू नये.
गंभीर लक्षणे दिसल्यास विलंब न करता तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी. रुग्ण गोंधळलेला दिसत असल्यास, उलट्या होत असल्यास, चालता येत नसल्यास किंवा शुद्ध हरपत असल्यास त्याला थंड जागेत हलवून अंगावर थंड पाणी टाकावे आणि त्वरित रुग्णालयात दाखल करावे, असे डॉ. तायडे यांनी सांगितले.

उष्णतेचा सामना करण्यासाठी गावपातळीवरही उपाययोजना आवश्यक आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विश्रांती केंद्रे, ओआरएसचा साठा आणि आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत नागरिकांची तपासणी या बाबी महत्त्वाच्या ठरतात.
दीर्घकालीन उपाय म्हणून झाडे लावण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. झाडांमुळे सावली मिळते तसेच परिसरातील तापमान कमी होण्यास मदत होते.
शेवटी, उष्णतेची लाट ही सहन करण्याची गोष्ट नसून ती ओळखून टाळण्याची आपत्ती आहे. योग्य वेळी खबरदारी घेतल्यास अनेक जीव वाचू शकतात, असे आवाहन डॉ. कमलेश तायडे यांनी केले.






