नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव: शहरात सध्या उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर वाढला असून तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पुढे गेला आहे. या वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळावा आणि शहरात थंडावा निर्माण व्हावा, यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे शनिवारी (२५ एप्रिल) दुपारी शहरातील प्रमुख चौकांमध्ये टँकरद्वारे पाणी मारण्यात आले. महापौर दीपमाला काळे यांच्या निर्देशानुसार आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत महानगरपालिकेने ही मोहीम राबवली.

दुपारच्या कडक उन्हात रस्ते तापल्याने निर्माण होणारी उष्णता कमी करण्यासाठी दोन टँकरच्या मदतीने महत्त्वाच्या ठिकाणी पाणी मारण्यात आले. हे २ टँकर महापौर दीपमाला काळे यांनी त्यांच्यावतीने उपलब्ध करून दिले होते. यात चित्रा चौक, कोर्ट चौक, नवीन बस स्टँड परिसर, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, नेहरू चौक, टॉवर चौक या कार्यवाहीमुळे परिसरात काही अंशी थंडावा निर्माण झाला असून, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना व नागरिकांना उष्णतेच्या लाटेपासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शहर अभियंता योगेश बोरोले, पर्यावरण विभागाचे अधिकारी प्रकाश पाटील यांच्यासह महापालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष रस्त्यावर उपस्थित होते. आगामी दिवसांत उष्णतेची तीव्रता पाहता अशाच प्रकारे उपाययोजना राबवण्याबाबत महापालिका प्रशासन विचार करत आहे.







