
नवराज्य Live न्यूज
जळगाव : जळगाव शहराच्या सौंदर्यीकरणाला गती देण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी कंबर कसली आहे. शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी गुरुवारी (९ एप्रिल) महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील प्रमुख चौक आणि दुभाजकांच्या (डिवायडर) सुशोभीकरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून, पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत.

एकरूपता आणि सौंदर्यावर भर
शहरातील प्रत्येक चौक आणि दुभाजक सुशोभित करताना त्यात ‘सिमिलॅरिटी’ (एकरूपता) आणि एक ‘ऱिदम’ असावा, अशी स्पष्ट भूमिका महापौर दीपमाला काळे यांनी मांडली. त्या म्हणाल्या की, “बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर शहराची पहिली छाप उत्तम पडली पाहिजे. त्यासाठी रेखांकन आणि डिझाईन आकर्षक असावे. दुभाजकांची उंची आणि रिफ्लेक्टर्स एकसारखे असावेत, तसेच वृक्षारोपण करतानाही एकाच प्रकारची झाडे लावण्यात यावीत.”
अतिक्रमणांवर हातोडा आणि वाहतुकीचे नियोजन
सुशोभीकरणाच्या आड येणारी सर्कलच्या आजुबाजूची सर्व अतिक्रमणे तातडीने काढण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. विशेष म्हणजे, दुभाजक बनवताना ते चौकाला अगदी लागून न बनवता, पादचाऱ्यांसाठी ‘झेब्रा क्रॉसिंग’ ची जागा सोडण्याची महत्त्वाची सूचना करण्यात आली आहे.
काम न करणाऱ्या विकासकांना अल्टिमेटम
बैठकीत विविध विकासकांनी पीपीटी आणि व्हिडिओद्वारे सादरीकरण केले. मात्र, शिवाजीनगर ते जैन मंदिर दरम्यानच्या सुशोभीकरणाचे काम घेतलेल्या विकासकांनी अद्याप प्रतिसाद न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त झाली. या विकासकांना पुढील ८ दिवसांची मुदत देण्यात आली असून, तरीही काम सुरू न झाल्यास दुसऱ्या विकासकाला काम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या प्रमुख मार्गांचा होणार कायापालट
टॉवर चौक ते महापालिका इमारत
शिवतीर्थ चौक ते नंदिनीबाई विद्यालय
स्वातंत्र्य चौक ते आकाशवाणी चौक
कावरत्नावली चौक ते माबळ स्टॉप
डी-मार्ट ते रामानंदनगर आणि लांडोरखोरी उद्यान
मेहरूण येथील स्वामी समर्थ चौक ते एकनाथ नगर
सिंधी कॉलनी चौक ते पिंपराळा उड्डाणपूल
*पुढील पाच वर्षे राहिल मेंटेनन्स*
खंडवा पिस ते अजिंठा चौक दरम्यान काम करताना वाहतूक शाखा आणि महावितरणचे सहकार्य घेतले जाणार आहे. हे काम केवळ करून थांबायचे नसून, पुढील ५ वर्षे त्याचे मेंटेनन्स (देखभाल) करण्याची जबाबदारीही संबंधित संस्थांची राहणार आहे.
सदर बैठकीमध्ये महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही महापौरांनी सूचना केल्या. जळगाव शहरात रस्त्यांमध्ये कुठेही विजेचे खांब येत असतील तर ते काढून त्याचे स्थलांतर करा. तसेच वाहतूक शहर शाखेला देखील सूचना दिल्या की, शहरातील विविध चौकात रिक्षा, दुचाकी व इतर वाहने कुठेही बेशिस्त पद्धतीने थांबतात त्यांना योग्य शिस्त लावा आणि वाहतूक सुरळीत करा.

या बैठकीला उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त पंकज गोसावी, वास्तुविशारद संदीप सिकची, ललित राणे, पर्यावरण विभाग प्रमुख प्रकाश पाटील, विद्युत विभागाचे संदीप मोरे, अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर, फुले मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मतानी यांच्यासह विविध विकासक संस्थांचे प्रतिनिधी, महावितरण आणि वाहतूक शाखेचे प्रतिनिधी उपस्थित होते.







