नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव – ‘शौर्याचे पाऊल क्रांतीच्या दिशेने’ टाकत महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ‘पंतप्रधान सायकल रॅली २०२६’ मध्ये सहभागी होऊन एस.यु.ओ. खुशबू गोसावी हिने पुणे ते नवी दिल्ली हा खडतर प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे. खुशबूचे रविवारी शिव कॉलनी चौकामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. या दैदिप्यमान यशाबद्दल जळगाव शहराचे आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते खुशबूचा गौरव करण्यात आला.
एनसीसी कॅडेट खुशबू गोसावी हिने पुणे ते नवी दिल्ली दरम्यानच्या या सायकल मोहिमेत आपल्या जिद्दीच्या जोरावर यश मिळवले. ही मोहिम एनसीसी महाराष्ट्रच्या इतिहासातील एक मैलाचा दगड मानली जात आहे. तिच्या या यशाने जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
खुशबूच्या या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी शिव कॉलनी चौकात नागरिकांनी उपस्थिती दिली. नगरसेविका अंकिता पंकज पाटील व सामाजिक कार्यकर्ते पंकज सुरेश पाटील यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी खुशबूच्या ध्येयवेड्या प्रवासाचे कौतुक करत तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
“जळगावच्या मुलीने दिल्लीपर्यंत सायकलने प्रवास करून महिला शक्तीचा परिचय करून दिला आहे,” अशा भावना यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी खुशबू गोसावी हिचा परिवार, शिव कॉलनी परिसरातील ग्रामस्थ आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.






