नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : किर्तन ऐकताना खाली बसून ग्रहण करावे असे ज्ञानी सांगतात. हेच वाक्य खरं करत आमदार राजू मामा भोळे, हे बहिणाबाई महोत्सवात हभप रवीकिरण महाराज यांच्या कीर्तनात आले. त्यांनी महाराजांचे दर्शन घेऊन, चक्क सोपा व खुर्ची नाकारून थेट खाली बसले. त्यांच्या समवेत इतर मंडळी देखील खुर्ची सोडून खाली बसले.
कीर्तनाच्या पूर्वसंख्येला नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार प्रसंगी. आमदार राजुमामा भोळे यांनी नगरसेवकांचे अभिनंदन केले.त्यांनी आगामी काळामध्ये आपल्या प्रभागांमध्ये वृक्षारोपणाची मोठी जबाबदारी घेऊन पर्यावरणाला हातभार लावावा. तसेच आठवड्यातून एकदा इंधन बचत करून सायकलीचा वापर करावा असे आवाहन शहराचे लाडके आ. सुरेश भोळे राजूमामा यांनी केले.
भरारी बहुउद्देशीय संस्था आणि क्रेडाई, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ११ व्या ‘बहिणाबाई महोत्सवा’च्या सोमवारी झालेल्या सत्रात जळगाव महापालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचा जंगी सत्कार करण्यात आला. याच सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘बहिणाबाई विशेष सन्मान’ देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्यात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या होनाजी चव्हाण, सागर वाघ, चंद्रकांत सोनवणे, मनोज भंडारकर आणि भिका न्याहाळदे यांना मान्यवरांच्या हस्ते ‘बहिणाबाई विशेष सन्मान’ देऊन गौरविण्यात आले. दरम्यान शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणारे उज्वल बेंडवाल आणि विकी सोनार यांचाही विशेष गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आ. सुरेश भोळे (राजूमामा), पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अनिश शहा, रजनीकांत कोठारी, दीपक सूर्यवंशी या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रसंगी शहरातील ७५ प्रभागातून निवडून आलेल्या व बिनविरोध झालेल्या नगरसेवकांचा आ. राजूमामा भोळे व महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांनी प्रभागांमध्ये विकासाची जबाबदारी खांद्यावर घेऊन समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करून आ. राजूमामा भोळे यांनी पर्यावरणपूरक आणि स्वच्छ व सुंदर शहर या संकल्पनेवर भर देण्याचे सांगितले.
सायंकाळी शेवटच्या सत्रात दोंडाईचा येथील ह.भ.प. रविकिरण महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले. संत तुकारामांच्या अभंगाचा दाखला देत त्यांनी मानवी स्वभावावर भाष्य केले. “कोणाकडूनही अवास्तव अपेक्षा करू नका, कारण माणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलत नाही,” असे सांगत त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या ओघवत्या शैलीतील कीर्तनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.
आज, २७ जानेवारी रोजी महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. सायंकाळी शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील, तर रात्री ९ वाजता शशिकांत सरवदे व सहकारी ‘लावणी महाराष्ट्राची’ हा बहारदार कार्यक्रम सादर करणार आहेत. जळगावकर रसिकांनी या सांगता सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.







