भाजपचे निष्ठावान कार्यकर्त्यांना अश्रू अनावर
नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : भारतीय जनता पक्षाच्या तिकीट वाटपाची प्रतीक्षा करणाऱ्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरल्याचे चित्र मंगळवारी स्पष्ट झाले. तिकीट जाहीर होताच एकामागोमाग एक नावे समोर आली आणि बर्याच जणांच्या चेहऱ्यावर निराशेची छाया पसरली. शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये आयोजित बैठकीत आमदार राजू मामा भोळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी आपली नाराजी मोकळेपणाने व्यक्त केली. या वेळी वातावरण भावनिक झाले आणि काहींचे अश्रू ओघळल्याचे पाहायला मिळाले. आमदार भोळेंनाही या परिस्थितीने गहिवरल्याचे जाणवत होते.
महालातील सूचनांनुसार महायुतीचा फॉर्म्युला राबविण्यासाठी स्थानिक पातळीवर तडजोड करावी लागली. त्यामुळे अनेक ठिकाणी स्वबळावर काम करणाऱ्या आणि वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा मार्ग कापला गेल्याची भावना व्यक्त होत आहे. तिकीट वाटपाच्या प्रक्रियेत निष्ठावंतांपेक्षा युतीच्या समीकरणांना प्राधान्य दिल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.
बैठकीत कार्यकर्त्यांनी खुलेपणाने मांडणी करताना म्हटले —
“लोकसभा, विधानसभा, नगरपालिका — कुठेही आम्ही मागे राहिलो नाही. प्रचारात, पक्षाच्या कार्यक्रमात, उपक्रमात आम्ही मनापासून श्रम आणि पैसा घातला. लाखोंची गुंतवणूक केली, जनसंपर्क केला… तरी संधी आमच्यापासून दूर ठेवली जाते. आता तरी युतीचा पुनर्विचार करा; स्वबळावर लढण्याचा विचार करा.”
“दुसऱ्याचा झेंडा हातात घेऊन फिरायचे कशासाठी? आमची ओळख, आमची कामगिरी, आमच्या मतदारांच्या भावना कोण समजणार?” असा सवालही काही कार्यकर्त्यांनी केला.
या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्रातील महायुतीचा फॉर्म्युला अंतिम करण्यात आला असला तरी जळगावमध्ये नाराजी, अस्वस्थता आणि अंतर्गत खदखद वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत.







