जळगाव प्रतिनिधी :
जळगाव महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांमध्ये फेरफार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे करण्यात आला आहे.
पक्षाने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही अधिकारी-कर्मचारी राजकीय दबावाखाली व आर्थिक आमिषाने एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट करीत आहेत, जे बेकायदेशीर असून लोकशाहीस धोकादायक आहे.
पक्षाने मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण करूनच त्यांचे प्रकाशन करावे, अशी मागणी केली असून आवश्यक असल्यास न्यायालयीन कारवाईस तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.
हे निवेदन मनपाचे आयुक्त यांना देण्यात आले असून, या वेळी अशोक लाडवंजारी, सुनील माळी, राजू मोरे, रहीम तडवी, डॉ. रिझवान खाटीक, किरण राजपूत आदी उपस्थित होते.





