नवराज्य Live न्यूज नेटवर्क
अमळनेर : अमळनेर शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थान येथे लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दुर्घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.आगीत झालेल्या नुकसानीचा आढावा घेत जिल्हा व तालुका प्रशासनाला तात्काळ आणि युद्धपातळीवर आवश्यक उपाययोजना करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.
संत सखाराम महाराज वाडी हे केवळ धार्मिक स्थळ नसून हजारो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. त्यामुळे या ठिकाणी झालेल्या नुकसानीबद्दल सर्व स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री पाटील यांनी यांच्याकडून देण्यात आल्या असून नुकसानग्रस्त भागाच्या पुनर्वसनासाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या आगीत मोठे नुकसान झाले असले तरी संत सखाराम महाराज वाडी संस्थानाचा वैभवशाली वारसा पुन्हा पूर्ववत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. प्रशासन, स्थानिक नागरिक आणि भाविकांच्या सहकार्याने पुनर्बांधणीची कामे वेगाने करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील दिली.







