नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव: जिल्ह्यातील सुरवाडा येथील रहिवासी तथा दादाश्री विश्व ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रीतीश गणेश चौधरी यांना अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाउंडेशनतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘नियतीचे चक्र’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत यश संपादन करणाऱ्या महाराष्ट्रातील निवडक व्यक्तींना हा मानाचा पुरस्कार दिला जातो. सन २०२६ च्या पुरस्कारासाठी लोहारा येथील रहिवासी डॉ. प्रीतीश चौधरी यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ येथे सन्मानित करण्यात आले.
दि. २१ जून रोजी मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ येथे भारतीय जैन संघटना आणि दिव्याज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिव्याज फाउंडेशनच्या अध्यक्षा अमृता फडणवीस, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलालजी मुथा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
डॉ. प्रीतीश चौधरी हे दादाश्री विश्व ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात विविध उपक्रम राबवत आहेत. बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करणे तसेच वंचित घटकांसाठी कार्य करणे या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारामुळे समाजासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली असून, शोषित व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची भावना डॉ. प्रीतीश चौधरी यांनी व्यक्त केली.






