नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव – सीईटी परीक्षा, इंजिनिअरिंग-मेडिकलसह सर्व विद्याशाखांची केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया आणि विविध शिष्यवृत्ती योजनांच्या माहितीसाठी आता जळगावच्या विद्यार्थ्यांना मुंबई किंवा पुण्याच्या चकरा मारण्याची गरज उरणार नाही. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांच्या घोषणेनुसार राज्यात ४० सीईटी सेल विद्यार्थी सहायता केंद्रे १० जूनपासून सुरू झाली आहेत. यात जळगावात मुख्य केंद्र केसीई अभियांत्रिकीत सुरू झाले असून, संपर्क अधिकारी राजीव जामोदकर यांची नियुक्ती केली आहे.
दलालांकडून होणारी आर्थिक लूट थांबणार
दरवर्षी सीईटीचा निकाल लागल्यानंतर कॅप फेऱ्या सुरू होतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी अनेकदा इंटरनेट कॅफे किंवा दलालांच्या चुकीच्या माहितीवर अवलंबून राहतात, ज्यामुळे अनेक जण शिष्यवृत्तीपासून वंचित राहतात. शासनाचा हा वन-स्टॉप उपक्रम आता थेट जळगावच्या कॉलेजमध्ये उपलब्ध झाल्यामुळे, विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे कायदेशीर व तांत्रिक समुपदेशन मिळेल.


