नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव:जळगाव शहरातील तांबापूर परिसरातील बिस्मिल्ला चौकात बुधवारी उशिरा रात्री दगडफेकीची घटना घडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आणण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांसह उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गानपुरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून नागरिकांनी कोणतीही अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इच्छादेवी चौक परिसरात दारू पिण्यावरून दोन गटांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद वाढत जाऊन पुढे गवळीवाडा परिसरात दोन्ही गट आमनेसामने आले आणि त्यातून जोरदार दगडफेक झाली.
या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेदरम्यान पोलिसांवर कोणतीही दगडफेक झालेली नसल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गानपुरे यांनी स्पष्ट केले आहे.
