नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव :शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील रायसोनी नगर भागात असलेले भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान गेल्या काही काळापासून बंद अवस्थेत आहे. या उद्यानाचा विकासकांद्वारे कायापालट करून ते नागरिकांसाठी पुन्हा खुले करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर, महापौर दीपमाला काळे यांनी शुक्रवारी या उद्यानाला भेट देऊन तेथील सद्यस्थितीची सविस्तर पाहणी केली.
१७ सप्टेंबर २०२१ रोजी लोकार्पण झालेल्या या उद्यानाची दुरवस्था झाली असल्याने, त्याचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी व सद्यस्थिती पाहणी करण्यात आली. यावेळी महापौरांनी उद्यानातील विविध घटकांचा अभ्यास केला. पाहणी दरम्यान पर्यावरणप्रेमी संस्थांचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांनी महापौरांना उद्यानातील सद्यस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली. यामध्ये विविध बाबींची अभ्यासपूर्ण पाहणी करण्यात आली.
जलव्यवस्थापन: उद्यानातील पाण्याची टाकी, पक्षांसाठीचे पाण्याचे पानवठे आणि झाडांना पाणी देण्यासाठी असलेली ड्रीप (ठिबक) सिस्टीम.
पायाभूत सुविधा: उद्यानात उपलब्ध असलेला जॉगिंग ट्रॅक आणि महापालिकेकडून पाणी पुरवठ्यासाठी करण्यात आलेली पाईपलाईन जोडणी.
वृक्षसंपदा: उद्यानात सद्यस्थितीत असलेली विविध प्रकारची झाडे आणि त्यांची काळजी घेण्यासाठी आवश्यक उपाययोजना.
हे उद्यान पर्यावरणप्रेमी विकासकांच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने विकसित केले जाईल, जेणेकरून परिसरातील नागरिकांना, बालकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी एक उत्तम ठिकाण उपलब्ध होईल. जॉगिंग ट्रॅक देखील प्रस्तावित आहे.
या पाहणी दौऱ्यात महापौर दीपमाला काळे यांच्यासोबत स्थानिक नगरसेवक सुरेखा तायडे, प्रफुल्ल देवकर, राजेंद्र नन्नवरे, चेतना नन्नवरे, सविता भोळे, अनिल भोळे, उमेश इंगळे, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी उद्यानाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधत ते लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली, ज्यावर महापौरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.




