नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या वादळी वारे, गारपीट आणि जोरदार पावसामुळे अनेक भागांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीकडे नोंदविताना अडचणी येत असल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक घेत कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी तसेच दूरध्वनीवरून आयुक्तांना आवश्यक सूचना दिल्या. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या नुकसानीची माहिती ऑनलाईन पद्धतीने तात्काळ नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे शक्य नाही, त्यांनी संबंधित तालुक्यातील विमा प्रतिनिधी किंवा कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून माहिती द्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
तसेच ज्या शेतकऱ्यांच्या पीक विम्यात क्षेत्र कमी दाखविण्यात आले आहे किंवा ज्यांचे विमा अर्ज रद्द झाले आहेत, अशा प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष पंचनामा करून वास्तविक क्षेत्र ग्राह्य धरण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.सर्व पीक विमाधारक शेतकऱ्यांनी याबाबत तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केले आहे.



