नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव – “कौटुंबिक कलह हा फक्त पती-पत्नीतील वादापुरता मर्यादित नसून शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, शेतकरी समस्या अशा विविध अंगांनी तो समाजात दिसून येतो,” असा महत्त्वपूर्ण विचार अरुण बोरोले यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ यांच्या “कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्र” खान्देश शाखेचा उद्घाटन समारंभ २२ रोजी सायंकाळी ५ वाजता ओंकारनगर, जळगाव येथे उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला महासंघाचे ज्येष्ठ सल्लागार व माजी नगराध्यक्ष बंडू दादा काळे, अध्यक्ष अरुण बोरोले, खान्देश महिला उपाध्यक्षा नीता वराडे, कोषाध्यक्ष डॉ. मिलिंद पाटील, जळगाव जिल्हा लेवा पाटीदार मंडळाचे अध्यक्ष लिलाधर चौधरी, विधी सल्लागार डॉ. ॲड. ज्योती भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात लकी ड्रॉच्या माध्यमातून निवड झालेल्या शांताराम फेगडे यांच्या हस्ते समुपदेशन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले, ही बाब उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरली.

समुपदेशनाची गरज अधोरेखित करताना नीता वराडे यांनी समाजातील विविध स्तरांवर मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याचे सांगितले. तर बंडू दादा काळे यांनी समितीचे काम निःपक्षपाती व समाजाभिमुख पद्धतीने करण्याची ग्वाही दिली.
यावेळी माजी आरोग्य सभापती कमलाकर रोटे यांनी या उपक्रमाचे स्वागत करत सहकार्याची भूमिका व्यक्त केली. तसेच डॉ. ॲड. ज्योती भोळे यांनी समाजाच्या सर्वांगीण

समस्यांवर काम करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.या समारंभाला महासंघाचे पदाधिकारी, सदस्य तसेच लेवा पाटीदार समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिलिंद पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन महेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सांगता साधना लोखंडे यांनी सादर केलेल्या पसायदानाने झाली.






