नवराज्य Live न्यूज नेटवर्क
मुंबई : बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्रातील जनतेकडून अपेक्षित असलेली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती अखेर जाहीर झाली आहे. ही युती मुंबईतील वरळी सी-फेस येथील हॉटेल ब्ल्यू सी (Hotel Blue Sea) येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली.
या पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी “कुठल्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे” असे सांगत युतीची अधिकृत घोषणा केली. त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रात सध्या राजकीय अस्थिरतेचे वातावरण असून काही राजकीय शक्ती राज्याच्या हिताऐवजी स्वार्थासाठी काम करत आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी ही युती आवश्यक होती.
“ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्रातील जनता अनेक दिवसांपासून करत होती, ती युती आज जाहीर होत आहे. मुंबईचा महापौर मराठीतच होणार,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “ठाकरे घराण्याने मुंबई आणि महाराष्ट्रासाठी संघर्ष केला आहे. मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाला. आज आपण जर आपसात भांडत राहिलो, तर ज्यांनी या भूमीसाठी बलिदान दिले, त्या हुतात्म्यांचा अपमान होईल.”
उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले की, “मुंबई किंवा महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, संघर्षातून मुंबई आणि महाराष्ट्र मिळवला आहे. मुंबईचे लचके तोडण्याचे, महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे काहींचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत.”
या युतीच्या घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड मानली जात असून, विशेषतः आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या युतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







