नवराज्य Live न्यूज
जळगाव शहरातील लहान-मोठ्या नाल्यांवरील कठड्यांची (रेलिंग) झालेली दुरावस्था आणि अनेक ठिकाणी कठडेच नसल्यामुळे निर्माण झालेला धोका लक्षात घेता, महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, असे कडक निर्देश उपमहापौर मनोज चौधरी यांनी दिले आहेत.
नेरी नाका परिसरातील नाला तसेच शिवाजी उद्यानाजवळील नाल्यावरील कठडे पूर्णपणे तुटले असून शहरात इतरही अनेक ठिकाणी अशीच बिकट परिस्थिती आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नाले तुडुंब भरून वाहत आहेत. याच रस्त्यांवरून दररोज शाळेत जाणारी लहान मुले, स्कूल बस, रिक्षा आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात.
गेल्या काही दिवसांत या तुटलेल्या कठड्यांमुळे दुर्घटना घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. भविष्यात अशा कोणत्याही जीवघेण्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी उपमहापौर मनोज चौधरी यांनी मनपा बांधकाम विभागातील सर्व अभियंत्यांना (इंजिनिअर्स) तात्काळ घटनास्थळी पाहणी करून फॅब्रिकेशनच्या माध्यमातून तात्पुरती किंवा योग्य ती संरक्षक व्यवस्था उभारण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
“नागरिकांचा आणि विशेषतः लहान मुलांचा जीव मोलाचा आहे. पावसाळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बांधकाम विभागाने गांभीर्याने आणि युद्धपातळीवर तात्काळ काम सुरू करावे.”








