नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित या संस्थेच्या नावाचा आणि अधिकृत लेटरहेडचा कथित गैरवापर केल्याप्रकरणी विजय भास्कर पाटील यांच्यासह इतरांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतःला संस्थेचा अध्यक्ष म्हणून दर्शवत विविध शासकीय कार्यालयांशी पत्रव्यवहार केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला असून, पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध कलमांन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित, जळगाव (मविप्र) या शैक्षणिक संस्थेचे अधिकृत अध्यक्ष नसताना स्वतःला अध्यक्ष भासवून बनावट लेटरहेड, शिक्के व कागदपत्रे तयार करून विद्यापीठ व शासकीय कार्यालयांची दिशाभूल केल्याप्रकरणी संशयित अॅड. विजय भास्कर पाटील यांच्याविरुद्ध जळगाव येथील जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
संस्थेचे मानद सचिव नीलेश रणजित भोईटे यांनी २७ जुलै रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. विजय पाटील यांनी स्वतःला संस्थेचे अध्यक्ष दाखवणारे बनावट लेटरहेड, रबरी शिक्के व खोटी कागदपत्रे तयार केली. ही बनावट कागदपत्रे त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, सहायक आयुक्त मागासवर्ग कक्ष, जळगाव तसेच विविध शासकीय विभागांत वापरून पत्रव्यवहार केला. जिल्हापेठ पोलिसांनी सोमवारी सायंकाळी तब्येत घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी साडेसहा वाजता जीएमसी रुग्णालयात दाखल केले.
याशिवाय ४ मे २०२६ रोजी नाशिक येथील सहाय्यक आयुक्त (मागासवर्ग कक्ष) कार्यालयालाही अशाच स्वरूपाचे पत्र पाठविण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या पत्रांमुळे संस्थेच्या अधिकृत लेटरहेडचा वापर झाल्याचा भास निर्माण करून संबंधित शासकीय कार्यालयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादीची पडताळणी केल्यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक २२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३३६(२), ३३६(३), ३३८, ३४० आणि ३१८(४) अंतर्गत विजय भास्कर पाटील व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार विजय भास्कर पाटील यांच्याविरुद्ध यापूर्वीही एका प्रकरणात गुन्हा नोंद झाला होता. त्या प्रकरणात तपास पूर्ण होऊन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सध्याच्या प्रकरणात शासकीय कार्यालयांना पाठविण्यात आलेल्या पत्रव्यवहारामागील उद्देश, त्यातून कोणताही लाभ मिळविण्याचा प्रयत्न झाला का आणि या प्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास जिल्हापेठ पोलीस करीत आहेत








