नवराज्य Live न्यूज नेटवर्क
(संतोष ताडे शिरसोली )
शिरसोली (प्रतिनिधी ) : शिरसोली प्र.न. व शिरसोली प्र.बो. येथील सूर्यवंशी बारी पंच मंडळाच्या नेतृत्वाखाली समाजातील वाढत्या अनिष्ट, खर्चिक आणि सामाजिकदृष्ट्या घातक प्रथांवर नियंत्रण आणण्यासाठी विचारमंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले. शिरसोली प्र.बो. येथील बारी भवनात पार पडलेल्या या बैठकीत समाजहिताच्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.
समाजात साधेपणा, संस्कार, आर्थिक बचत आणि सामाजिक शिस्त टिकवण्यासाठी सर्व समाजबांधवांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. लग्न समारंभातील वाढता अनावश्यक खर्च, दिखाऊपणा आणि काही चुकीच्या परंपरांवर नियंत्रण आणण्यासाठी विविध विषयांवर सखोल चर्चा झाली.
बैठकीत लग्नपत्रिकेत दिलेल्या मुहूर्तावरच विवाह लावणे, दोन वेळा विवाह सोहळे टाळणे, मेहंदी कार्यक्रम आणि प्री-वेडिंग शूट बंद करणे, लग्नातील बॅनरबाजी थांबवणे, महिलांनी सार्वजनिक ठिकाणी फेटे बांधून नृत्य करणे टाळणे, साखरपुड्याऐवजी नारळवाटीची प्रथा सुरू करणे तसेच रात्री उशिरापर्यंत डीजे किंवा बँड न वाजवता मर्यादित वेळेत कार्यक्रम पूर्ण करण्यावर एकमत झाले.
बैठकीत ठरविण्यात आलेल्या आचारसंहितेचे पालन सर्व समाजबांधवांना बंधनकारक राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीस पारोळा, अमळनेर, चोपडा, यावल, रावेर, ऐनपूर, भुसावळ, सोयगाव, आमखेडा, शेंदूर्णी, पहूर, कुऱ्हा पानाचे, जळगाव, पिंप्राळा, हरिविठ्ठल नगर, बऱ्हाणपूर, शहापूर, बंभाडा, अंतुर्ली, वालसावंगी, पारध, धामणगाव, वाघोड, चापोरा, शिरपूर आणि नंदुरबार येथील पंच मंडळांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.
रतन फुसे (पीआय, पारोळा) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. समाजात एकोपा टिकवून पुढील पिढीला चांगले संस्कार देण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीत एकमताने मंजूर झालेले प्रमुख निर्णय
वेळेवर लग्न लावणे
लग्नपत्रिकेत दिलेल्या मुहूर्तावरच विवाह सोहळा पार पाडणे
मेहंदी कार्यक्रम बंद करणे
प्री-वेडिंग शूटिंग बंद करणे
लग्नातील बॅनरबाजी थांबवणे
महिलांनी सार्वजनिक ठिकाणी फेटे बांधून नृत्य करणे टाळणे
साखरपुड्याऐवजी नारळवाटीची प्रथा सुरू करणे
रात्री डीजे/बँड न वाजवता मर्यादित वेळेत कार्यक्रम पूर्ण करणे



