नवराज्यLive न्यूज नेटवर्क
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील लक्ष्मी नारायण नगर कॉलनी परिसरात, अयोध्या नगरच्या मागील भागातील नाल्यात पुन्हा एकदा रासायनिक व तेलयुक्त पाणी सोडल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत अशा प्रकारच्या घटना चार ते पाच वेळा घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर स्थानिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दुर्गंधी आणि प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त
नाल्यात सोडलेल्या रासायनिक पाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून पाण्याचा रंगही बदललेला दिसत आहे. या प्रदूषणामुळे हवा आणि पाणी दोन्ही दूषित होत असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
नगरसेवकांचा प्रशासनाला इशारा
या प्रकरणाची दखल घेत नगरसेवक विरेन खडके यांनी महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली.
“नागरिकांच्या आरोग्याशी कुठलाही तडजोड होऊ देणार नाही. दोषींवर कडक कारवाई झाली नाही तर नागरिकांसह आंदोलन छेडू,” असा इशारा त्यांनी दिला.
नागरिकांची नाराजी, ठोस उपाययोजनेची मागणी
स्थानिक रहिवाशांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत, वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला. “यामुळेच अशा घटना पुन्हा घडत आहेत,” असे नागरिकांनी सांगितले. त्यांनी महापालिकेकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने दखल घ्यावी
या घटनेमुळे पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाले असून, प्रदूषण नियंत्रण मंडळानेही याची गंभीर दखल घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. शहरातील नाले व जलस्रोत सुरक्षित ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असून त्यात कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.







